मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा विचार करताना पालक विविध योजना आणि गुंतवणुकीचे पर्याय शोधतात. याच अनुषंगाने पोस्ट ऑफिसच्या बाल जीवन विमा योजना (Child Life Insurance Scheme) ही एक अत्यंत उपयुक्त आणि सुरक्षित विमा योजना आहे, जी फारशा पालकांच्या लक्षातही आलेली नाही. ही योजना विशेषतः मुलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आली असून ती पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) आणि रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) अंतर्गत चालवली जाते.

विमा रक्कम आणि बोनसचे फायदे

ही योजना मुलांसाठी विमा सुरक्षा देण्याबरोबरच आकर्षक बोनसही देते. पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत विमा रक्कम ३ लाख रुपयांपर्यंत असते, तर रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत ही रक्कम १ लाख रुपये असते. दोन्ही योजनेचे प्रीमियम वेगवेगळे असले तरी दोन्हीमध्ये बोनसचा समावेश आहे. RPLI अंतर्गत तुम्हाला १,००० रुपयांच्या विम्यासाठी दरवर्षी ४८ रुपयांचा बोनस मिळतो, तर PLI अंतर्गत ५२ रुपयांचा बोनस दिला जातो. हे बोनस एंडोमेंट पॉलिसीप्रमाणे काम करतात, ज्यामुळे विम्याशिवाय अतिरिक्त लाभ मिळतो.

पात्रता आणि गुंतवणुकीचे स्वरूप

ही विमा योजना मुलांच्या पालकांकडून खरेदी केली जाते आणि एका पालकाला जास्तीत जास्त दोन मुलांसाठी पॉलिसी घेण्याची परवानगी आहे. हे पॉलिसी ५ ते २० वयोगटातील मुलांसाठी लागू होते. मात्र, पालकाचं वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावं, ही अट पाळावी लागते. गुंतवणुकीचे पर्यायही लवचिक आहेत—मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम भरता येतो. ही योजना पाच वर्ष नियमित प्रीमियम भरल्यास “पेड-अप” पॉलिसी बनते, म्हणजे उर्वरित कालावधीसाठी विमा चालू राहतो, जरी प्रीमियम भरले गेले नाहीत तरी.

मृत्यू झाल्यास विमा संरक्षण

या योजनेचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे पालकाचा किंवा मुलाचा मृत्यू झाल्यास विमा संरक्षणाचं कवच टिकून राहतं. पालकाचा पॉलिसीच्या मुदतीपूर्वी मृत्यू झाल्यास उर्वरित प्रीमियम माफ केले जातात आणि पॉलिसी चालू राहते. मुलाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला बोनससह संपूर्ण विमा रक्कम दिली जाते. त्यामुळे ही योजना केवळ गुंतवणूक नाही, तर एक संपूर्ण सुरक्षात्मक कवच आहे.

इतर वैशिष्ट्यं आणि मर्यादा

या योजनेत वैद्यकीय तपासणीची गरज नाही, पण मूल निरोगी असणं आवश्यक आहे. योजनेमध्ये कर्ज सुविधा दिली जात नाही, तसेच ही पॉलिसी सरेंडर करता येत नाही, म्हणजेच एकदा घेतल्यानंतर ती समाप्त होईपर्यंत कायम ठेवावी लागते. ही अट पालकांनी ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र, या अटीमुळेच योजनेचं दीर्घकालीन आणि गॅरंटीड रिटर्नचं स्वरूप मजबूत होतं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *