Geopolitical Tension Update (Iran-Israel War Impact): इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने संपूर्ण जगात चिंता निर्माण केली आहे. या संघर्षाचा परिणाम केवळ राजकीय पातळीवर मर्यादित राहणार नाही, तर याचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेपासून सामान्य नागरिकांच्या रोजच्या खर्चावरही उमटू शकतात. विशेषतः कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि भारताची यावर असलेली अवलंबित्व, ही स्थिती अधिक गंभीर बनवते.
का वाढतायत तेलाच्या किमती?
गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत ११% पेक्षा जास्त वाढ झाली असून, सध्या त्याचा दर प्रति बॅरल ७५.३२ डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. जागतिक पुरवठा साखळीतील एक प्रमुख मार्ग — होर्मुजची खाडी — इराणच्या नियंत्रणात आहे आणि याच मार्गातून जगभरात २०% कच्चं तेल पोहोचतं. भारतासाठीही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपल्याकडे आयात होणारं ६५% हून अधिक तेल आणि ५०% एलएनजी (Liquefied Natural Gas) या मार्गावर अवलंबून आहे.
संभाव्य इंधन दरवाढ: पेट्रोल २३० रुपये?
इराकचे परराष्ट्रमंत्री फुआद हुसैन यांनी याविषयी गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, जर हा संघर्ष अधिक तीव्र झाला तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल २०० ते ३०० डॉलर्सपर्यंत जाऊ शकतात. अशा स्थितीत भारतात पेट्रोलचे दर २०० ते २३० रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे देशांतर्गत महागाईचा झपाट्याने भडका उडण्याचा धोका आहे.
भारताला याचा कसा फटका बसेल?
भारतातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आयातीनिर्भर आहे. इंधनाच्या दरवाढीचा सरळ परिणाम संपूर्ण लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळीवर होतो, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होते. त्यातच, भारताचे दोन्ही देशांशी राजनैतिक संबंध सौहार्दपूर्ण असले तरी, इस्रायलच्या बाजूने झुकाव असल्याची भूमिका काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक मांडत आहेत, जी इराणसाठी असह्य ठरू शकते.
कोणत्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात?
या संघर्षामुळे खालील उत्पादनांच्या किमतीत वाढ होऊ शकते:
-
दैनंदिन वस्तू: साबण, डिटर्जंट, बिस्किटे, रंग, शीतपेय
-
इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट्स: मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही
-
कृषी व उद्योग क्षेत्र: खतं, औद्योगिक रसायनं, प्लास्टिक, औद्योगिक मीठ
-
खाद्यपदार्थ व वस्त्रं: खाद्यतेल, काजू, फळं, धान्य
-
इतर महागड्या वस्तू: दागदागिने, रत्नं, यंत्रसामग्री
सामान्य नागरिकांवर होणारा आर्थिक परिणाम
-
वाहतुकीचा खर्च वाढेल – यामुळे किराणा माल, भाजीपाला आणि इतर वस्तू महाग होतील.
-
आयातीवर परिणाम – इलेक्ट्रॉनिक वस्तूंची उपलब्धता कमी होईल आणि किमती वाढतील.
-
कृषी उत्पादन महागेल – इंधन महागल्यामुळे शेतीची किंमत वाढेल, परिणामी अन्नधान्य महागेल.