भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ५० बेसिस पॉईंट्स म्हणजेच ०.५० टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेपो दर आता ५.५०% वर आला आहे. सलग तिसऱ्यांदा केलेल्या या दरकपातीमुळे बँकांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जावरचा व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम मासिक ईएमआयवर होणार आहे.
रेपो दर म्हणजे काय आणि त्याचा परिणाम कसा होतो?
रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक बँकांना अल्पकालीन कर्ज किती व्याजदराने देते, याचा दर. जेव्हा RBI रेपो दरात कपात करते, तेव्हा बँकांचे कर्ज घेण्याचे खर्च कमी होतात आणि त्या बँका आपल्या ग्राहकांनाही कमी व्याजदराने कर्ज देण्यास प्रवृत्त होतात. परिणामी गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यांचे EMI कमी होतात.
५० लाख रुपयांच्या गृहकर्जावर किती बचत होणार?
जर एखाद्या व्यक्तीनं ३० वर्षांसाठी ५० लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं असेल आणि त्याचा व्याजदर ९% असेल, तर त्याचा मासिक EMI सुमारे ₹40,231 इतका येतो. मात्र, RBI कडून ५० बेसिस पॉईंट्सनी कपात झाल्यानंतर जर बँकेनं तितक्याच प्रमाणात व्याजदरात कपात केली, तर हाच EMI सुमारे ₹38,446 होईल. म्हणजेच दर महिन्याला सुमारे ₹1,785 इतकी बचत होईल. ३० वर्षांच्या कालावधीत एकूण सुमारे 6.4 लाख रुपयांहून अधिक बचत होऊ शकते.
२० लाख रुपयांच्या कर्जावर किती कमी होईल EMI?
जर एखाद्या व्यक्तीनं २० वर्षांसाठी २० लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं आणि त्यावर देखील ९% व्याज लागू होत असेल, तर त्याचा मासिक EMI सुमारे ₹17,995 येतो. रेपो दर कपातीनंतर आणि बँकेनं त्यानुसार व्याजदर कमी केल्यास हा EMI सुमारे ₹17,356 इतका होईल. म्हणजेच दर महिन्याला जवळपास ₹639 ची बचत होईल. २० वर्षांत एकूण सुमारे ₹1.53 लाख रुपयांची बचत ग्राहक करू शकतात.
कर्जदारांसाठी महत्त्वाचा इशारा
EMI मध्ये ही कपात तितक्याच वेगाने होणार की नाही, हे पूर्णपणे बँकेच्या धोरणावर अवलंबून आहे. RBI चा रेपो दर कमी झाला असला तरी बँकेनं जर तातडीनं आणि संपूर्ण प्रमाणात व्याजदर कमी केले नाहीत, तर EMI कमी होण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा फायदा अपूर्ण राहू शकतो. त्यामुळे कर्ज घेताना किंवा रिफायनान्स करताना नवीन व्याजदराची अचूक माहिती घेणं आवश्यक आहे.