Mhlive24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- शेतकर्यांसमोर चिंतेचे वातावरण
पुढचे ४८ तास राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच ११ ते १५ डिसेंबर दरम्यान मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाच्या रिमझिम सरी पडतील तर ढगाळ वातावरण असणार आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतही गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस पावसाचा जोर जास्त असेल, तर १३ ते १५ डिसेंबर दरम्यान पुन्हा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिल. कोरोना, लॉकडाऊन, महापुरातून सावरत असलेल्या शेतकऱ्यासमोर आता बदलत्या हवामानाचा फटका बसणार असल्याने पुन्हा चिंतेेचे वातावऱण आहे.
अवेळी पाऊस, दमट हवामानामुळे पिकांच्या नुकसानीची शक्यता
दरम्यान अवेळी होणारा पाऊस आणि दमट हवामान यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी देखील चिंतेत आहे. काजू आणि फळबागांना आलेला मोहोर गळून पडण्याची शक्यता असल्यानं येत्या काळात शेतकऱ्यांसमोर समस्या निर्माण होऊ शकते.
उत्तर, पश्चिम महाराष्ट्रालाही इशारा
जळगाव जिल्ह्यात आज पावसाची शक्यता तशी कमी असली तर पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार पडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार पाऊस पडेल. अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील ११ ते १५ डिसेंबर दरम्यान रिमझिम पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज आहे.
आज मुंबईसह उपनगरात आणि राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. अचानक झालेल्या पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सध्या ढगाळ वातावरण आहे. तर पालघर-रायगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस तर काही भागात ढगाळ वातावरण आहे.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर